Skip to main content

अर्धांगिनीस पत्र



10 वर्ष !!!  2007 ते 2017.

किती वेगळं आहे हे सगळं.  आपण प्रेमात काय पडलो...लग्न मोडता मोडता झालं काय आणि आता लग्न होऊन 10 वर्ष झाली.  किती सहज निघून गेली इतकी वर्षे.  आता आठवलं तर खरच इतका काळ लोटला आहे का असा प्रश्न पडावा इतक्या सहज.  

मला तो दिवस अजून आठवतो जेव्हा तू सकाळी 7 वाजता चेंबूरच्या आपल्या घरी मला सांगायला आली होतीस की आपलं लग्न होऊ शकत नाही.  त्याच्या आदल्या दिवशी रात्री तुझ्या घरी आपल्याबद्दल समजल्यामुळे त्यांनी विरोध केला.  तुझ्या आईसाठी तू इमोशनल झाली होतीस.  त्या दिवशी किती रडली होतीस तू?  तुझं रडणं थांबावं म्हणून मी माघार घेतली आणि सांगितलं नाही करायचं लग्न.  (थोडक्यात हे मोडल्यासारखंच झालं).  हा सगळा प्रकार बघून माझ्या आईला टेन्शन.  तिला वाटायचं ही याच्या आयुष्यातून गेली तर हा देवदास होईल.  मग मी नंतर ऑफिसला सुट्टी टाकली.  मग 3-4 तास आपण एकत्र घालवल्यावर तुझा विचार पलटला आणि लग्न करायचंच असा ठाम निर्णय मला सांगितलास.  केवढे होतो आपण तेव्हा?  फक्त 21-22 वर्ष.  मी नोकरीला लागून नुकतेच 5-6 महिने झाले होते आणि पगार फक्त 5 हजार.  तुझा निर्णय परत घरी जाऊन बदलेल असं मला वाटलं होतं पण नाही झालं तसं.  तुझे पप्पा लग्नाची बोलणी करण्यासाठी माझ्या घरातल्याना भेटायला तयार नव्हते आणि मग तुझं लग्न ते परस्पर ठरवायला निघाल्यावर आपल्याकडे पर्याय नव्हता.  इतक्या लवकर लग्न व्हावं अशी माझी ईच्छा नव्हती पण लग्न करा किंवा विषय सोडून द्या अशी परिस्थिती आली.  मग निर्णय घेण्याशिवाय पर्याय नव्हता.  तुझ्यासारखी मला समजून घेणारी दुसरी मुलगी मिळणार नाही हे माझं मत होत (ते आजही तसच आहे.  दुसऱ्या कुणी मला आणि माझ्या वेडेपणाला कस सहन केल असत हा प्रश्न आहेच). कोर्ट मॅरेंज साठी 14 फेब्रुवारी तारीख ठरली.  

मी सहज विचारायचं म्हणून परागला आपल्या पत्रिकेबद्दल त्याच्या बाबांशी बोलायला सांगितलं होतं.  परागचे बाबा लग्नपत्रिका बघतात हे मला माहित होत.  परागला पण थोडं फार त्यातलं कळत होत आणि पत्रिका पाहिल्याबरोबरच त्याने सांगितलं की, "भारी मित्रा.  तुमच्या दोघांचे 36 च्या 36 गुण जुळतात."  मी भयंकर खुश झालो.  पण तो रात्री बाबांना पत्रिका  दाखवून कन्फर्म करणार होता.  मी रात्री निकालाची वाट पाहत सुभाषनगरच्या मैदानामध्ये  बसलो होतो.  पराग चा कॉल आला पण तो नाराज वाटत होता.  त्याने बाबांना फोन दिला.
"पत्रिका जुळत नाही.  36 गुण जुळतायत पण पत्रिकेत दोष आहे.  लग्न करणं योग्य नाही. पुढे मुलाबाळांसहित सगळे त्रास येणार", बाबांनी एकाच वाक्यात सगळं सांगून टाकलं.  तसा माझा विश्वास नव्हता या गोष्टींवर पण तूझ्या सांगण्यावरून मी ती पत्रिका दाखवली होती.  जेव्हा तूला मी ते सांगितलं तेव्हा पुन्हा एकदा तू ठाम होतीस.  "होईल ते बघू.  बाबांकडून उपाय घेऊ", ही तुझी वाक्य.  म्हणजे कोणत्याही परिस्थितीत आपलं लग्न व्हायचं होतच तर.

अगदी 13 तारखेपर्यंत नक्की नव्हतं की उद्या आपल लग्न होईल.  असं काहीतरी वेगळं आपल्या घरातल्यानी कधीच केलं नव्हतं त्यामुळे प्रत्येकाच्या मनात भीती होतीच.   दादाने तर विडाच उचललेला की लग्न व्यवस्थित पार पाडायचं.  अप्पांचे मित्र विजय काका यांनी या गोष्टीसाठी सपोर्ट दाखवला आणि दोन तीन मित्रांच्या अशा लग्नाचा अनुभव असल्याने धीरही दिला.  

"मुलगी नक्की तयार आहे का?  म्हणजे लग्नानंतर पोलीस कम्प्लेंट करावी लागते.  मुलीच्या घरातल्याना बोलावतात.  त्यात जर मुलीने स्टेटमेंट आपल्या विरोधात दिली तर तुझ्याबरोबर जेवढे लग्नाला होते तेवढे सगळे आत जातील किडण्यापिंग च्या केस मध्ये", विजय काकांनी हे सांगून धक्काच दिला होता.  तसं मला माझं टेन्शन नव्हतं पण घरातल्याना आणि मित्राना माझ्यामुळे त्रास होऊ नये अशी ईच्छा होती.  तू एकदा यात उडी घेतल्यावर मागे फिरणार नाहीस याबाबत माझा तुझ्यावर विश्वास होता आणि मी ते दादाला सांगितलेलं.  दादाने सांगितलं, "जे होईल ते बघून घेऊ.  फक्त प्रतिभाला डिसीजन सोडू नकोस सांग".

आदल्या दिवशी 13 तारखेला रात्री आई आणि मी जाऊन तुझ्यासाठी साडी आणि माझ्यासाठी शर्ट घेतला. हीच काय ती लग्नाची खरेदी.  आईने एक मंगळसूत्र बनवून ठेवलं होतच.  तशी आई खूप भित्री आहे पण याकाळात सगळ्यांकडेच एक वेगळीच एनर्जी होती.

सकाळी 7 ला तू नेहमी ऑफिसला निघायचीस तशी रेशनकार्ड घेऊन निघालीस.  7.30 ला कुर्ल्याला भेटायचं ठरलं होतं.  प्रत्येक कामात मी तुला गिफ्ट दिलेला मोबाईल उपयोगी पडत होता.  मी लग्नाचं जास्त कुणाला सांगितलं नव्हतं.  पण मित्रांपैकी अजय, तानाजी, पराग, जागृती हे आवर्जून येणारच होते आणि त्यांना सांगणं भागच होत.  दादाने त्याच्या मित्र मैत्रिणींना बोलावलं होत. लग्नाचे फोटो प्रूफ म्हणून लागतील म्हणून आपली पहिली लग्नाची ऑर्डर रूपेशला मिळाली.  तुझ्याकडून फक्त नम्रता आली होती.  कुर्ल्यावरून बसने आपण बांद्रा कोर्टात पोहचलो.  तिथे सगळी तयारी या सगळ्यांनी आधीच करून ठेवली होती.  आधी वैदिक पद्धतीने लग्न आणि मग कोर्टात जाऊन रजिस्ट्रेशन हा प्लॅन होता.  दादाने संजय गोविलकर दादांशी बोलून सगळी सेटिंग आधीच लावली होती.  एका छोट्याशा मंदीरात आपल्याबरोबरच अजून 3-4 जणांची लग्न होती.  तू मंदिरात आल्या आल्या आत तयारीला गेलीस.  आम्ही कितीही हसत खेळत होतो तरी मनात धाकधूक होतीच.  तुझ्या घरातल्याना कुठूनही समजलं आणि ते आले तर सगळं विस्कटणार होत.  भटजी पण आपल्याला अँटिक भेटला होता.  त्याने युपी बिहार स्टाइल मध्ये मंत्र बोलायला सुरुवात केली आणि तो जे काही मध्ये मध्ये सांगत होता ते मला काहीच कळत नव्हतं.  तू आलीस आणि नंतर लक्षात आलं की आपण मुंडावळ्या आणल्या नाहीत.  दादा अण्णाने धावत जाऊन कुठून तरी मुंडावळ्या आणल्या तोपर्यंत अर्ध अधिक लग्न उरकलं होत.  सप्तपदी तर आपण जवळ जवळ पळतच पूर्ण केली.  तुला मंगळसूत्र घालताना पुढे आयुष्यात काय होणार आहे त्याची काहीच कल्पना नव्हती.  मुलाचा मामा लग्नाच्या विधींसाठी  लागतो आणि योगायोगाने कमलाकर मामा गावावरून त्याच दिवशी आला होता.   सगळ्यांचे आशीर्वाद मिळाले.  लग्न पार पडलं. कोर्टात जाऊन रजिस्ट्रेशन करताना काही न्यूज चॅनेलवाले तिथे होते.  14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे असल्याने ते बरेच जण लग्न करतील असा त्यांचा अंदाज होता आणि ते जोडप्यांचे इंटरव्यू घ्यायला आले होते.  त्यावेळी आपल्याला लपवण्यासाठी सगळ्यांची चाललेली धडपड अजून आठवते.  दोघांनी तर मुद्दाम आपल्या गळ्यातले हार मागून घेतले आणि कॅमेरासमोर उभे राहिले.  रजिस्ट्रेशन झाल्यावर लग्नाचं जेवण कोर्टाच्या कॅन्टीनमध्ये.  आपण मसाला डोसा खाल्ला होता.  

सगळ झाल्यावर महत्वाचा भाग बाकी होता.  तो म्हणजे पोलीस एन सी.  आपण सगळे तसेच बसंत पार्क पोलीस चौकीत गेलो.  विजय काका आणि आप्पा आत बोलायला गेले.  तुला बाहेरूनच तुझ्या घरी कॉल करायला सांगितलं.  तू फोन केलास तो तुझ्या आईने उचलला.  "आई, मी सुबोधशी लग्न केलंय", तुझ्या पहिल्या वाक्यातच ठामपणा होता.  आईसाठी नक्कीच तो धक्का होता.  नंतर कॉल अमितने घेतला आणि साहजिकच तो तुझ्यावर वैतागला पण तू मागे हटली नाहीस.  तुझा माझ्यावरचा विश्वास त्यादिवशी मला ठळक दिसला.  नंतर आपल्या दोघांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं  गेलं.  हवालदार काका भयंकर गंभीर चेहऱ्याचे होते.  ती माझी आणि तुझी कोर्टाची आणि पोलीस स्टेशनची पायरी चढण्याची पहिलीच वेळ.  हवालदार काकांनी एन सी लिहून घेतली आणि नंतर सब इन्स्पेक्टर साहेबांसमोर बसलो.  त्यांनी आपल्या समोर पुन्हा तुझ्या घरी फोन केला व लग्नाबद्दल कल्पना आहे का ते विचारलं.  काही आक्षेप असल्यास पोलीस स्टेशन ला या असही सांगितलं.  पण तुझ्या घरातल्यांनी गोष्टी मान्य केल्या व काही हरकत नसल्याचं सांगितलं.  आपण पोलीस स्टेशन मध्ये पेढे वाटायला सुरुवात केली.  बऱ्याच सिनिअर पोलिसांनी तोंडभरून आशीर्वाद दिला.  एक इंस्पेक्टर तर तुला म्हणाले होते, "तू मला मुलीसारखी आहेस.  याने काही त्रास दिला तर माझ्याकडे यायचं".  हा एन सी प्रकार जितका कठीण वाटला होता तितका झाला नाही.  तुझ्या ठामपणामुळे सगळं सुरळीत पार पडलं.

मग आपण घरी आलो.  चाळीत नेमक्या त्याच दिवशी पाणी लेट येणार असल्याने सगळ्या बायका बाहेर बसल्या होत्या.  मी आम्हा भावांमध्ये तिसरा आणि पाहिलं लग्न केलं म्हणून बऱ्याच टीका माझ्या माथी त्यावेळी आल्या.  चाळीत बातमी वाऱ्यासारखी पसरली.  "एवढी घाई होती काय रे? आधी भावाचं तरी होऊन द्यायचं" ही वाक्य तर माझ्या नेहमीच कानावर.  पण दुनियेची फिकीर मी कधीच केली नव्हती.  संध्याकाळी तुझ्या घरातल्यानी आमच्या घरी फोन केला आणि "प्रतिभाला घरी पाठवा आपण थोड्या दिवसांनी सगळ्यांना सांगून त्यांचं लग्न लावून देऊ असं सांगितलं".  तुझ्या घरातले खरच साधे असल्याने आपल्या घरातल्यानी आढेवेढे घेतले नाहीत.  सगळ्यांना लगेच तोंड कस देणार म्हणून तू घरी जायला घाबरत होतीस पण मैदानात उतारलोय तर लढुया अशा भावनेने तू तिकडे निघून गेलीस. नंतर पूर्ण 3 महिने तू तिकडेच होतीस आणि एक दिवस चांगला मुहूर्त बघून तुला इकडे पाठवल.  त्या 3 महिन्यात तू आपल्या प्रेमासाठी काय सहन केल असशील याची जाणीव मला आहे.  

त्यानंतर पण जवळपास आतापर्यंत तू खूप काही सहन केलंस.  माझ्या स्ट्रगलमध्ये मला तुझ्यासाठी काहीच करता नाही आलं.  तुझ्याही अपेक्षा कधी मोठ्या नव्हत्या.  तू माझं जग हळूहळू तुझं जग करत गेलीस आणि माझी प्रत्येक व्यक्ती तुझी झाली.  आजही आपण भांडतो पण ते सहसा मीच केलेलं असत.  आपण बोलणं बंद करतो पण माघार अजूनही तूच घेतेस.  तू इतक्या वर्षात स्वतःला खूप बदलत गेलीस आणि नवीन गोष्टी शिकत गेलीस.  तुला नाटकात काम करताना आणि पहिल्यांदाच नाचताना बघणं खरच खूप कौतुकास्पद होत.  आता तू तुझी जी ईच्छा आहे ती मला स्पष्ट बोलून दाखवतेस आणि माझाही प्रयत्न असतो की ती पूर्ण होईल.  तुला जे वाटत ते कर.  आयुष्याची पूर्ण मजा घे.  तू अशा वेळी माझ्या आयुष्यात आलीस जेव्हा मी कुणीच नव्हतो, आजही नाही पण तुझा सपोर्ट माझ्यासाठी कायम काहीतरी करून दाखवण्याची स्वप्न जागृत करतो.   तू माझ्यासोबत आहेस हीच माझ्यासाठी ग्रेट फिलिंग आहे.  अजून लग्नाच्या वाढदिवसाची बरीच दशकं आपल्याला एकत्र साजरी करायची आहेत.  त्यामुळे प्रत्येक गोष्टीत स्वतःची काळजी घेत जा.  कारण तू मला खूप म्हणजे खूपच महत्त्वाची आहेस.

लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

तुझा,
सुबू


#sahajsaral

Comments

Popular posts from this blog

"तुमची प्रत्येक गोष्ट ट्रॅक होतेय!" 😮

" तुमची प्रत्येक गोष्ट ट्रॅक होतेय!" "If you are not paying for the product, then you are the product." नेटफलिक्सवर "सोशल डीलेमा" आणि "द ग्रेट हॅक" या दोन डॉक्युमेंटरी पहिल्या.  याच इंडस्ट्रीमध्ये बरीच वर्ष काम करत असल्याने सोशल मीडिया ॲप्सचे इंटर्नल वर्किंग बऱ्यापैकी माहीत होतंच पण यात ते अजून प्रखरपणे  हायलाईट झालं. "मुळात सगळ्याच गोष्टी फ्री मध्ये देणाऱ्या गूगल, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप सारख्या कंपन्या इतक्या श्रीमंत कशा?" असा प्रश्न मी कायम माझ्या सेशन मध्ये विचारतो.  यात नॉन टेक्निकल म्हणून मला बरीच उत्तर समोरच्या प्रेक्षकांकडून मिळतात जसं की, "इंटरनेट कंपनी त्यांना वापराचे पैसे देत असेल किंवा ते आपला डेटा विकत असतील".  काही लोक "ॲडवर पैसे कमवत असतील" असंही सांगतात पण ते नक्की कसं हे सांगता येत नाही.  हेच नेमकं या दोन्ही डॉक्युमेंटरीज मध्ये कव्हर केलं आहे. "त्यांना तुमच्यात इंटरेस्ट नाही तर तुमच्या इंटरेस्टमध्ये इंटरेस्ट आहे".  ज्यावेळी अमेरिकेचं इलेक्शन झालं होतं त्यावेळ केंब्रिज ॲनालिटीका या डे

माणुसकीची भिंत

माणसाने कोणत्या गोष्टीच्या प्रेमात पडावं किंवा कोणत्या गोष्टीचा ध्यास घ्यावा हे प्रत्येक व्यक्तींच्या मूळ स्वभावानुसार ठरत असतं.  काही व्यक्ती स्वतःकडे खूप काही असून दुनियेसमोर फक्त आपल्या समस्या घेऊन उभ्या राहतात तर काहीजण स्वतःकडे जे आहे त्यातला काही भाग समाजाला कसा उपयोगी ठरेल यासाठी कायम प्रयत्न करतात.  पुंडलिक दुसऱ्या प्रकारात मोडतो. माझी आणि पुंडलिकची ओळख तशी बऱ्याच वर्षांपूर्वीची.  एका भेटीत सगळ्यांनाच रुचेल असा हा व्यक्ती नाही.  परखड आणि स्पष्ट बोलणारा.  तसं माझंही अगदी पहिल्या भेटीत जमलं नाही.  आमची नाळ जुळण्यासाठी सहाएक महिने आरामशीर गेले असतील.  पण जो बंध घट्ट झाला तो कायमचाच.  बाहेर बाहेर कणखर दिसणारा हा व्यक्ती अत्यंत संवेदनशील व हळवा आहे.  खरंतर माणूस हा समाजशील प्राणी पण सध्याच्या व्यक्ती सोशल मोडियासारख्या वर्चुअल समाजात वावरतात.  पुंडलिक दोघांचं तारतम्य बरोबर राखून आहे.  उलट त्याला खऱ्याखुऱ्या समाजात वावरणं जास्त आवडतं.  एकदोन वर्षांपूर्वी पुंडलिकने "माणुसकीची भिंत" हा कन्सेप्ट माझ्यासमोर मांडला. आपण अशी एक भिंत उभी करायची ज्यावर आपल्याला नको असले

"उद्योजकतेची दिवाळी"

  "पप्पा, मी यावर्षी पण कंदीलाचा बिजनेस करणार आहे", सार्थक मोठ्या उत्साहात परवा मला सांगायला आला. "कस्टमर कोण? अजय काका?", मी गमतीने विचारले.  गेल्यावर्षी बिजनेसच्या पहिल्या वर्षात अजय काका हा एकच कस्टमर होता. सार्थकला प्रोत्साहन म्हणून त्याने कंदील घेतले आणि पेमेंट म्हणून काही शेअर्स त्याला गिफ्ट म्हणून पाठवले. "यावर्षी अजय काकाला आम्ही पार्टनर म्हणून घेणार. प्रत्येक कंदीलामागे कमिशन देणार", सॉफ्टवेअरमध्ये बिजनेस डेव्हलपमेंटच काम बघणारा अजा, कंदील विकताना कसा दिसेल या कल्पनेने हसू आलं.  अजय काका सार्थकचा हक्काचा माणूस आहे.  आणि अजय काकाला पण सार्थकचं भारी कौतुकही आहे. "परीक्षा संपल्यावर सगळं", मी सार्थकला सांगितलं. आज परीक्षा संपवून घरी आला आणि अण्णासोबत जाऊन त्याने कंदीलाच सामान आणलं. अण्णाकडून मदतीच प्रॉमिस घेतलंच होतं. पार्टनरशिपची ऑफर टाकण्यासाठी अजय काकाला फोन करा म्हणून माझ्या मागे लागला होता. पण हे सगळं त्यानेच करावं हे त्याला मी सांगितलं. फोन लावून त्याच्याकडे दिला पण लाजत असल्याने तो धावत मम्मीकडे गेला. मम्मीनेही माझं बोलणं ऐकलं असल्याम